प्रस्तावना
नवी संस्कृती घडवण्यासाठी आणि मानवी मनाचे आमूल परिवर्तन घडवण्यासाठी जी देवाणघेवाण, जी प्रक्रिया घडावी लागते, त्यात कृष्णमूर्ती शिक्षणाचे स्थान फार महत्त्वाचे मानतात.
निरनिराळी कौशल्ये आत्मसात करताना, विविध शाखांमधे शिकताना, जर स्वतःचा विचार, स्वतःच्या भावना आणि स्वतःची कृती यांबद्दलचे भान येण्यासाठीची ताकद मुलाला दिली गेली, तर असे परिवर्तन घडू शकते. स्वतःकडे डोळसपणे पाहणारी, स्वतःवर लक्ष ठेवणारी मुले त्यातून घडतात. त्यांचे माणसांशी, निसर्गाशी, माणसाने तयार केलेल्या साधनांशी योग्य असे नाते निर्माण होते.
भारतात आणि जगात इतरत्रही, सध्या अनेक पातळ्यांवर प्रचलित शिक्षणपद्धतीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माणूस आणि गुंतागुंतीचा असा सध्याचा समाज यांच्यात सुसंबद्धता निर्माण करण्यात शिक्षण पूर्णपणे अपयशी ठरले आहे असे दिसून आले आहे.